![]()
केंद्राच्या धर्तीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. मात्र, सरकारच्या याच ‘तत्परतेवरून’ आता राज्यातील राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “आयएएस अधिकाऱ्यांना तातडीने लाभ दिला जातो, मग आम्हालाच या हक्कापासून का वंचित ठेवले?” असा रोखठोक सवाल महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने विचारला असून, यासंदर्भात मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक आक्रमक निवेदन धाडले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, राज्य सरकारने ११ मे रोजी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, राज्य संवर्गातील आयएएस अधिकाऱ्यांना १ जानेवारी २०२६ पासून २% वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे. याचा शासन निर्णय लगेच निघाला, परंतु प्रशासनाचा कणा असलेल्या राज्यसेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाट्याला मात्र केवळ आश्वासनेच आहेत. या दुजाभावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अन्याय खपवून घेणार नाही! “सध्या महागाईचा निर्देशांक प्रचंड वाढत आहे. अशा स्थितीत प्रशासनाचा डोलारा सांभाळणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या लाभांपासून डावलणे अत्यंत अन्यायकारक आहे. सरकारने हा दुजाभाव थांबवून आम्हालाही न्याय द्यावा.” – नितीन काळे, अध्यक्ष राजपत्रित अधिकारी महासंघ
Source link
आयएएस अधिकाऱ्यांना तत्काळ ‘डीए’ वाढीवरून राज्य कर्मचाऱ्यांचा संताप:राजपत्रित अधिकारी महासंघ आक्रमक, मुख्यमंत्र्यांना निवेदन