![]()
श्रीगोंदे तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. पेरणीनंतर काही काळ समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतातील पिके कोमेजू लागली आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकरी विहिरी, बोअर तसेच उपलब्ध पाणीस्रोतांचा आधार घेत असले तरी मर्यादित पाणीसाठ्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यातच पावसाने पाठ फिरवल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळत नाही. अनेक ठिकाणी पिके कोमेजण्यास सुरुवात झाली असून पावसाचा खंड आणखी वाढल्यास पिके करपण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. श्रीगोंदे तालुक्याचा मोठा भाग डोंगराळ असल्याने या भागातील शेतीला पावसाच्या खंडाचा फटका अधिक जाणवत आहे. ढोरजा, भानगाव, मांडवगण, खांडगाव, पिसोरा आणि कोळगाव परिसरातील पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. काही भागांत आंतरमशागतीची कामे सुरू करण्याची तयारी असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची गणिते बिघडली आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र, विहिरी आणि बोअरमधील पाणीसाठा मर्यादित असल्याने हा आधार किती दिवस पुरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाचा खंड कायम राहिल्यास उत्पादनावर परिणाम होऊन आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले असून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाचा खंड, पिके संकटात; श्रीगोंदे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. मका, कापूस पिकावर परिणाम होण्याची शक्यता उत्पादन घटण्याची धास्ती पिकांच्या वाढीच्या टप्प्यात पावसाचा खंड पडल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळत नाही. पाऊस आणखी लांबल्यास सोयाबीन, मका, कापूस आदी खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू नये, यासाठी दमदार पावसाची गरज आहे.
Source link
चिंता वाढली:पावसाची दडी; पिके करपण्याच्या मार्गावर, उत्पादनात घटीची भीती, विहीर-बोअरच्या पाण्यावर पिके वाचवण्याची शेतकऱ्यांचंी धडपड