![]()
जळगाव जिल्ह्यातील शिवरे येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल करावा तसेच मोठ्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसभांना विनामुल्य पोलिस संरक्षण द्यावे या मागणीसाठी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने ता. 1 सप्टेंबर रोजी हिंगोलीत मुक मोर्चा काढण्यात आला. हिंगोली येथील जिल्हा परिषद कार्यालयापासून सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेल्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर संघटनेच्या वतीने मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील शिवरे (पारोळा) येथे 17 ऑगस्ट रोजी नियमित ग्रामसभा सुरू असताना ग्रामपंचायत अधिकारी स्व. पी. एन. पाटील यांच्यावर काही गटातील लोकांनी दबाव टाकला. त्यामुळे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 18 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामसभा कामकाजावर ठाम बहिष्कार टाकला आहे. शिवरे प्रकरणातील दोषींवर जलदगती न्यायालयात खटला चालवणे, वारंवार होणाऱ्या ग्रामसभांची संख्या कमी करणे, संवेदनशील ग्रामपंचायतींसाठी सक्तीचे व विनामूल्य पोलीस संरक्षण मिळावे, तसेच इतर विभागांच्या योजनांची माहिती देण्याची जबाबदारी संबंधित विभागांकडेच सोपवणे आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर वेळ धरणे आंदोलन करण्यात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे या मागणीची निवेदन सादर करण्यात आले. शासनाने या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा या पुढचे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले होते
Source link
जळगाव ग्रामपंचायत अधिकारी मृत्यू प्रकरण:हिंगोलीत मूक मोर्चा, खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी