![]()
चारनेरवाडी शिवारातील डोंगर परिसरातून वाहणाऱ्या जुना नदीचे खोलीकरण केल्याचा सकारात्मक परिणाम अवघ्या दोन-तीन दिवसांच्या पावसानंतर दिसून आला आहे. खोलीकरणामुळे नदीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला असून नदीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील कोरडवाहू शेतीला मोठा दिलासा मिळाला असून सुमारे एक हजार ते दीड हजार एकर जमीन ओलिताखाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चारनेर ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्रसिंग राजपूत यांनी जिल्हा परिषदेची आवश्यक परवानगी घेऊन नदी खोलीकरणाचा उपक्रम हाती घेतला. धरणांसाठी शेतकऱ्यांकडून जमीन संपादन करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी नदीचेच खोलीकरण करण्याचा पर्याय स्वीकारला. आवश्यक तांत्रिक माहिती व नियमांचे पालन करून सुमारे ४०० मीटर लांबीचे आणि तीन ते चार मीटर खोलीचे खोलीकरण करण्यात आले. या कामामुळे पावसाचे पाणी नदीत मोठ्या प्रमाणात साठून राहू लागले आहे. परिणामी, भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून परिसरातील विहिरी आणि बोअरवेलनाही फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या पावसामुळे नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने संपूर्ण परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीला दीर्घकालीन फायदा होणार, भूजलपातळी वाढणार खोलीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सरपंच रवींद्रसिंग राजपूत यांचे आभार मानत हा उपक्रम भविष्यातील जलसंधारणासाठी आदर्श ठरेल, अशी भावना व्यक्त केली. ग्रामस्थांच्या मते, योग्य नियोजनातून राबवण्यात आलेल्या या कामामुळे चारनेर परिसरातील शेतीला दीर्घकालीन लाभ मिळणार असून पाणीटंचाईवरही मोठ्या प्रमाणात मात होण्यास मदत होईल.
Source link
नदीचे खोलीकरण ठरले वरदान; चारनेरच्या जुना नदीला पाणी:परिसरातील दीड हजार एकर शेतीला होणार फायदा