.

गिरिजा नदीच्या ऐन पात्रात असलेले बोरगाव अर्ज येथील महाराष्ट्रातील एकमेव स्वयंभू गणपती मंदिर सध्या गणेशोत्सवानिमित्त भाविकांनी गजबजले आहे. गणपतीच्या २१ पीठांपैकी २० वे पीठ मानल्या जाणाऱ्या या जागृत देवस्थानात गणेशोत्सव सुरु असल्यामुळे राज्यभरातील भाविक दर्शनाला येत आहे.
छत्रपती संभाजीनगर-सिल्लोड महामार्गावरील आळंदपासून हे मंदिर अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर आहे. फुलंब्री-राजूर रस्त्यावरील टाकळी कोलते येथून ७ किलोमीटर अंतरावर हे निसर्गरम्य ठिकाण वसले आहे. जालना जिल्ह्यातून येणाऱ्यांसाठी टाकळी कोलते मार्ग आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर कडून येणाऱ्यांसाठी आळंद मार्ग आहे. २००७ मध्ये राज्य शासनाने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला असून गिरिजा नदीला पूर आल्यास भाविकांची अडचण होऊ नये. यासाठी येथे ८०० मीटर लांबीचा भव्य सेतू बांधण्यात आला आहे. या पुलावरून जाताना कोकणातील स्वरूप दिसते.
मंदिर परिसरातील दोन एकर जागेत भाविकांनी लावलेली नारळाची झाडे, नदीतील पाणी यामुळे परिसराला कोकण किनार पट्टीसारखे विलोभनीय रूप दिसते. येथे ब्रह्मलीन पूर्णगिरी महाराजांनी बांधलेले ऐतिहासिक हेमाडपंती महादेवाचे मंदिरही आहे. एकाच ठिकाणी गणेश आणि महादेवाचे दर्शन होते. त्यामुळे हे ठिकाण अध्यात्मासोबत पर्यटनाचे केंद्र बनले आहे. दर महिन्याच्या चतुर्थीला येथे महाआरती, महाप्रसादाचे आयोजन होते. गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान ११३ वर्षांची परंपरा असलेला भव्य यात्रा उत्सव येथे भरतो. गणेशोत्सवानिमित्त सध्या संपूर्ण मंदिरावर नयनरम्य रोषणाई करण्यात आली आहे.