![]()
पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या मुलीकडून सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडायला पाहिजे होते. त्यांनी उपोषण सोडायचे की नाही हा निर्णय सरकार घेऊ शकत नाही तो हजारो आंदोलकांपैकी एकाने घेतला पाहिजे होता, अशी जनभावना आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, आंदोलन हाताबाहेर जात असल्याने यांना पाकिस्तानमधून फंड मिळतोय, वांगचुक चीनच्या बाजूने भूमिका घेतात असे म्हणत सत्ताधाऱ्यांनी आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीसह देशभरात होणारे आंदोलन हाताबाहेर चालले आहे, अमित शहांच्या पोलिसांच्या हातातील लाठ्या काठ्या कामी पडणार नाही हे जेव्हा समजले तेव्हा हे आंदोलन उठवण्यासाठी सरकारने जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांना तिथे पाठवले. वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले याचा सर्वांनाच आनंद आहे. गेली 26 दिवस ते उपोषण करत होते. त्यांच्या आंदोलनामुळे एक आंदोलन उभे राहिले. देशातील युवा पिढी रस्त्यावर उतरली, ते आजही रस्त्यावर आहेत. पण वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती. त्यांनी सर्वांसमोर येत जंतर मंतरवर येत उपोषण सोडले असते तर देश अधीक आनंदित झाला असता. सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या? संजय राऊत म्हणाले की, ज्या सरकारविरोधात आपण आंदोलन केले त्या सरकारचे दोन मंत्री येतात आणि आपले उपोषण सोडतात. आंदोलक म्हणून मला वाटते की या देशातील हुकुमशाहीविरोधात लढा देणाऱ्या संघटना आणि पक्ष एकत्र आले आहे. त्यामधील कोणीतरी तिथे उपस्थित असायला हवे होते. किमान अभिजीत दिपके तिथे उपस्थित असायला हवे होते. किमान देशाचे विरोधी पक्षनेते वांगचुक यांचे उपोषण सोडवताना तिथे हवे होते. सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या या विषयी अजूनही संभ्रम आहे. जी मुळ मागणी होती ती शिक्षणमंत्री प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय उपोषण संपणार नाही अशी होती. प्रधान यांना का वाचवले जात आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे. आज शिवतीर्थांवर आंदोलन संजय राऊत म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांना वाचवले जाणार असेल तर वांगचुक यांनी 26 दिवस जे उपोषण केले ते काय कामाचे? त्याच मागणीसाठी लाखो लोकं रस्त्यावर उतरले, एका मुलीचा मृत्यू झाला, अमित शहा यांच्या आदेशाने पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या मुलांची डोके फोडले, त्यांच्यावर अत्याचार केला. या सर्वांचा विचार वांगचुक यांना करावा लागेल. उपोषण संपले असले तरी देशभरात उभे राहिलेले आंदोलन आता थांबणार नाही. आदित्य ठाकरेंचे शिवतीर्थांवर आंदोलन आहे, तर रविवारी आमचे आंदोलन असणार आहे. विरोधीपक्षाला विश्वासात घेत त्यांनी हे पाऊल उचलायला हवे होते. सरकार चर्चेला घाबरते संजय राऊत म्हणाले की, सरकार चर्चेला घाबरते. आम्ही पुलवामाच्या वेळी चर्चा करावी असे सांगितले होते पण त्यावर चर्चा झाली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर लोकसभेत कधी चर्चा केली जात नाही. नीट पेपर फुटी प्रकरणी आम्ही चर्चा मागत होतो सरकारने लोकसभा अधिवेशनात तो वेळ दिलाच नाही. आता सरकारचे लोकं आंदोलन संपवण्यासाठी त्याला बदनाम केले जात होते.
Source link
मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती:धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय उपोषण का संपवले? आंदोलन थांबणार नाही- संजय राऊत