![]()
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला आपल्या अद्वितीय दिग्दर्शनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री विजया मेहता यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीचा एक सुवर्णकाळ संपला असून, कलाविश्वात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाना पाटेकर, विक्रम गोखले यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनय प्रवासाला आकार देण्यात आणि त्यांचे यश घडवण्यात विजयाबाईंचे मोलाचे योगदान होते. विजया मेहता यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी गुजरात मधील बडोदा (वडोदरा) येथे झाला होता. मुंबई विद्यापीठातून पदवी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी दिल्लीत थिएटरचे खंदे पुरस्कर्ते इब्राहिम अल्काझी आणि आदी मर्झबान यांच्याकडे नाट्यकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. ६० च्या दशकात त्यांनी मराठी प्रायोगिक रंगभूमीवर आपली घट्ट छाप पाडली. नाटककार विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत त्यांनी ‘रंगायन’ या ऐतिहासिक नाट्यगटाची स्थापना केली. मराठी रंगभूमीवर त्यांना अत्यंत आदराने आणि प्रेमाने ‘बाई’ म्हणून संबोधले जायचे. काही वर्षांपूर्वी त्यांचे याच नावाने म्हणजेच ‘बाई’ या नावाने आत्मवृत्तांतपर पुस्तकही प्रकाशित झाले होते. सी. टी. खानोलकर लिखित आणि विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेले ‘एक शून्य बाजीराव’ हे नाटक भारतीय रंगभूमीवरील मैलाचा दगड मानले जाते. नाट्यशास्त्रातील उत्कृष्टतेचा राष्ट्रीय बहुमान विजया मेहता यांच्यातील दिग्दर्शकाला १९७५ मध्ये ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते. तर १९८६ मध्ये आलेल्या प्रसिद्ध ‘राव साहेब’ चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. समांतर सिनेमा आणि नाट्य चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्य शाखेतून अभिनेत्री म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. शेक्सपिअरच्या ‘ऑथेल्लो’ नाटकाचे मराठी रूपांतर असलेल्या ‘झुंजारराव’ नाटकातील त्यांची ‘कमळजा’ ही भूमिका प्रचंड गाजली. यानंतर ‘संशयकल्लोळ’, ‘तुझे आहे तुझपाशी’ आणि ‘सुंदर मी होणार’ अशा अनेक अजरामर नाटकांतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘बॅरिस्टर’ ते ‘वाडा चिरेबंदी’; दिग्दर्शनाचा अनोखा आकृतीबंध विजयाबाईंनी कौटुंबिक एकांकिकांपासून ते भव्य तीन अंकी नाटकांचे वैविध्यपूर्ण दिग्दर्शन केले. त्यांनी दिग्दर्शित केलेली खालील नाटके मराठी नाट्यसृष्टीचा अनमोल ठेवा आहेत. इंडो-जर्मन थिएटरचा मिलाफ विजयाबाईंनी केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर मराठी संस्कृती पोहोचवली. जर्मन दिग्दर्शक फ्रिट्स बेनव्हिट्झ यांच्या सोबतीने त्यांनी ‘मुद्राराक्षस’, ‘शाकुंतल’, ‘हयवदन’ आणि ‘नागमंडल’ ही नाटके जर्मन रंगभूमीवर सादर केली. दोन भिन्न देशांच्या संस्कृतीचा हा अनोखा मिलाफ जागतिक रंगभूमीवर कौतुकाचा विषय ठरला होता. वैयक्तिक जीवन विजया मेहता यांचा पहिला विवाह प्रसिद्ध अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे सुपुत्र हरिन खोटे यांच्याशी झाला होता. त्यांना रवी आणि देवेन ही दोन मुले झाली. मात्र, हरिन खोटे यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी फर्रोख मेहता यांच्याशी दुसरा विवाह केला. विजयाबाई आणि फर्रोख मेहता यांना अनाहिता ही मुलगी आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यात रंगभूमीलाच आपले दैवत मानणाऱ्या ‘बाई’ यांच्या निधनाने अवघी नाट्यसृष्टी पोरकी झाली असून सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
Source link
मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ हरपला:ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; नाना पाटेकर, विक्रम गोखलेंना घडवणाऱ्या 'बाई' काळाच्या पडद्याआड