Headlines

'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियान:30 वर्षांवरील नागरिकांची होणार आरोग्य तपासणी, पाच लाख नागरीकांचा असणार सहभाग




हिंगोली जिल्ह्यात ता. 1 सप्टेबर ते ता. 10 डिसेंबर या कालावधीत ‘माझे गांव आरोग्य संपन्न गांव’ उपक्रमात 30 वर्षावरील 5 लाख नागरीकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामुळे तातडीने आजारांचे निदान होऊन औषधोपचार केले जाणार आहेत. यातून ग्रामीण भागातील नागरीकांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, नोडल अधिकारी डॉ. रवींद्र पुरी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देवेंद्र जयभाये यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव तसेच अन्य कारणांमुळे नागरिकांमध्ये असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आरोग्य तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात तीस वर्षीवरील 5 लाख 97 हजार 956 नागरिकांची तपासणी या अभियानात करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा समन्वयक (एनसीडी) डॉ. इनायतुल्ला खान यांनी दिली. यांसारख्या आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास त्यांचे योग्यवेळी उपचाराही सुरू करता येतात. या अभियानांतर्गत 30 वर्षे व त्यावरील नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच तोंडाचा, स्तनाचा व गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी प्राथमिक तपासणी करण्यात येईल. तपासणीमध्ये संशयित आढळणाऱ्या नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थेकडे संदर्भित करण्यात येणार आहे. तपासणीपासून निदान, उपचार आणि त्यानंतरच्या पाठपुराव्यापर्यंत आवश्यक कार्यवाही सुनिश्चित करण्यात येणार आहे. सात टप्यांत अभियानाची अंमलबजावणी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, 30 वर्षांवरील नागरिकांची नोंदणी, पहिल्या टप्प्यात गावपातळीवर प्रथम तीन गावांतील नागरिकांची तपासणी, दुसऱ्या टप्प्यात उर्वरित गावांतील नागरिकांची तपासणी, उपकेंद्र स्तरावरील तपासणी, तालुका व जिल्हास्तरावरील तपासणी आणि आवश्यक आरोग्य सेवा यांचा समावेश आहे. या सर्व टप्प्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसण्याची वाट न पाहता 30 वर्षे व त्यावरील प्रत्येक महिला व पुरुषाने नियमित आरोग्य तपासणी करून या अभियानाचा लाभ घ्यावा. उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच तोंडाचा, स्तनाचा किंवा गर्भाशय मुखाचा कर्करोग यांचे लवकर निदान झाल्यास वेळेत उपचार करणे शक्य होते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या जवळच्या उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र किंवा संबंधित शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि अभियानाचा आवर्जून लाभघ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *