![]()
चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल ६ बंद घरे फोडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आली. चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरातील ६१ हजार ६०० रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह इतर घरांमधून ऐवज लांबवला आहे. येथील रहिवासी निर्मला यशवंत महाजन (वय ४८) यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा मध्यरात्री १.३० ते सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तोडला. चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील दागिने व रोकड असा एकूण ६१ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. निर्मला महाजन यांच्या घराव्यतिरिक्त चोरट्यांनी हिरालाल हरी धनगर, सुभाष परशुराम पाटील, विजय साळुंखे, अमोल पाटील आणि आबा निंबाजी गढरी यांच्याही बंद घरांचे कुलूप तोडून चोरी केली. एकाच रात्री झालेल्या या धाडसी चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी निर्मला महाजन यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नंदकुमार महाजन पुढील तपास करत आहे.
Source link
मेहूणबारे:मेहुणबारे येथे मध्यरात्री सहा बंद घरांमध्ये चोरी