![]()
जिल्ह्यातील वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने वर्षात कारवाई करत ३२० वीज चोरी प्रकरणांचा भंडाफोड केला . उपकार्यकारी अभियंता श्रीकांत तळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता शंकर राऊत, सहकाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी राबवली. जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकाने विविध ठिकाणी धाडी मारत केलेल्या कारवाईत ३३ लाख २५, ६०३ युनिट वीज चोरी झाल्याचे उघड झाले असून, त्यांची किंमत सुमारे ५ कोटी ८४ लाख ६७ हजार आहे. भरारी पथकाच्या सतर्कतेमुळे हे प्रकार वेळेत उघडकीस आले. या मोहिमेत ३२ प्रकरणांत गुन्हे दाखल केले असून, विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई केली. कलम १२६, इतर तरतुदींनुसार ९१ प्रकरणांवरही कारवाई केली आहे. भरारी पथकाने जिल्ह्यात संशयास्पद ठिकाणी छापे टाकले असता २२९ ठिकाणी वीज चोरी होत असल्याचे आढळले. तपासात वीज चोरीचे अनेक प्रकार उघड झाले. त्यात मीटरमधील वायर कापणे, मीटर बंद करणे, फ्लॅश प्रणाली निष्क्रिय करणे, मीटरला छिद्र पाडून त्यात रोधक निर्माण करणे, मीटर बायपास करून वीज वापरणे अशा पद्धतींचा समावेश आहे. वीज चोरीमुळे कंपनीला फटका बसतो, वितरण हानीत वाढ होते. वीज चोरीमुळे यंत्रणेवर अनधिकृत भार वाढून अखंडित वीज पुरवठ्याला अडथळा होतो. त्यामुळे महावितरणची वीज चोरी विरोधात मोहिम आक्रमकपणे राबवणार आहे, असे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांनी स्पष्ट केले. ५ कोटी ४ लाख रुपयांची वसुली महावितरणने ३२० पैकी २९८ प्रकरणांमध्ये तडजोडीची संधी देत ५ कोटी ४ लाखांची वसुली केली आहे. मात्र,अद्याप २२ प्रकरणांत ८१ लाख ६३ हजारांची वसुली बाकी असून ती वसूल करण्यासाठी पुढील कारवाई सुरू आहे.
Source link
वर्षात 320 वीज चोऱ्या; 5.85 कोटींची चोरी उघड:जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई