![]()
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शंभूनगर परिसरात मोठी कारवाई करत १५० मिमी उपजलवाहिनीवरील तब्बल ९६ अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला बाधा आणणाऱ्या पाणीचोरीला आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार, बुधवारी (दि. १२ जून) ही विशेष मोहीम राबवण्यात आली. त्रिशरण चौकाजवळील शंभूनगर परिसरातून गादिया विहारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून जाणाऱ्या उपजलवाहिनीवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील पाणी चोरीवर आळा बसण्यास मदत होणार असून, अधिकृत नळधारकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुक्तांनी यापूर्वीच शहरातील सर्व मुख्य व वितरण जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करून अनधिकृत नळ जोडण्या शोधून त्या तातडीने खंडित करण्याचे निर्देश दिले होते. अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पथक अभियंता रोहित इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. यावेळी अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे, कार्यकारी अभियंता वसंत भोये, उपअभियंता किरण धांडे, शाखा अभियंता महेश चौधरी, कनिष्ठ अभियंता सुशिल कुलकर्णी आणि दुय्यम आवेक्षक सचिन वसावे यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सचिन कुंभार, सहायक फौजदार चंद्रकांत पोटे, हेड कॉन्स्टेबल गजानन महेर, विजू बोरसे, महिला अंमलदार रजेला भिल्ल, निता मोथुळे तसेच नागरी सहाय्यक पथकाचा यात समावेश होता. अनधिकृत नळ जोडण्या आणि पाणी चोरीमुळे अधिकृत ग्राहकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे महानगरपालिकेने अशा प्रकारच्या कारवाया पुढील काळातही सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि प्रत्येक अधिकृत ग्राहकापर्यंत पुरेसे पाणी पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Source link
शंभूनगरात मनपाची कारवाई, 96 अनधिकृत नळ जोडण्या खंडित:150 मिमी उपजलवाहिनीवरील पाणीचोरीवर आळा घालण्यासाठी मोहीम