![]()
राज्यातील 17 पैकी 6 विधान परिषदांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्यानंतर, आता उर्वरित जागांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये संपूर्ण राज्याचे लक्ष सातारा-सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी म
.
महायुतीमधील या अंतर्गत नाराजीच्या चर्चेला आता खुद्द साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीच दुजोरा दिला आहे. शंभूराज देसाई यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दरे या मूळ गावी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास बंद दाराआड खलबते झाली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना देसाई यांनी भाजपच्या सध्याच्या भूमिकेवर आणि कार्यपद्धतीवर आपली तीव्र नाराजी उघडपणे व्यक्त केली.
‘येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू?’
विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या कोणत्याही महत्त्वाच्या बैठकांना शिवसेनेला विश्वासात घेतले जात नसल्याची, अथवा साधे निमंत्रणही दिले जात नसल्याची खंत देसाई यांनी बोलून दाखवली. या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी एका ग्रामीण म्हणीचा संदर्भ दिला. “विधान परिषदेच्या बैठकांसाठी आम्हाला निमंत्रणच नसेल, तर आमची अवस्था ‘येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू’ अशी झाली आहे,” असा उपरोधिक सवाल उपस्थित करत त्यांनी महायुतीमधील समन्वयाच्या अभावावर थेट बोट ठेवले.
भाजपचे धैर्यशील कदम निवडणुकीच्या रिंगणात
एकीकडे महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आणि नाराजी नाट्य पाहायला मिळत असताना, दुसरीकडे या मतदारसंघातील लढतीचे चित्र मात्र स्पष्ट झाले आहे. सातारा-सांगली विधान परिषद मतदारसंघासाठी विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीने अभयसिंह जगताप यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे. तर, त्यांच्या विरोधात सत्ताधारी महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता या अंतर्गत नाराजीचा निवडणुकीच्या प्रत्यक्ष निकालावर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळीही मतभेद
दरम्यान, सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महायुतीमध्ये साताऱ्याचे दोन्ही राजे अर्थात खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विश्वासात न घेताच परस्पर निर्णय घेतले जात असल्याचा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. या राजकीय घडामोडींच्या निमित्ताने, यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या तीव्र संघर्षाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून, त्यावेळी या स्थानिक वादाचे पडसाद थेट विधानसभेतही उमटल्याचे पाहायला मिळाले होते.