![]()
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ वरील हैदतपूर–वडाळा टोल नाक्यापासून २५ कि.मी. परिसरातील स्थानिक नागरिकांना टोल शुल्कात सवलत द्यावी. रस्त्यासह पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल नाक्याची वसुली बंद करावी. या मागणीसाठी तालुका भाजपाच्या वतीने शनिवारी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत समाधानकारक तोडगा न निघाल्याने कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. रस्ता रोको आंदोलन सुरू केले. अखेर तहसीलदार योगेश गाडे व ठाणेदार आधारसिंग सोनवणे यांच्या मध्यस्थीने या ज्वलंत मुद्यावर तोडगा काढण्यात आला. त्यानुसार तात्पुरता टोल नाका बंद करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत टोल वसुली बंद राहणार आहे. परिणामी आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. हे भाजपसह सर्वपक्षीय आंदोलनाचे फलित असल्याचे सांगितले जात आहे. आंदोलनादरम्यान तहसीलदारांमार्फत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले. टोल नाक्यापासून २५ कि.मी. परिसरातील नागरिकांना शिक्षण, शेती, रोजगार, व्यवसाय, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, आरोग्य सेवा व इतर अत्यावश्यक कामांसाठी दररोज अनेकदा या मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे वारंवार टोल शुल्क भरावे लागते. स्थानिक नागरिकांवर आर्थिक भार पडतो. त्यामुळे २५ कि.मी. परिसरातील सर्व पात्र गावांतील खासगी वाहनांना टोल सवलत लागू करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व तालुका भाजपा अध्यक्ष रमेश तायवाडे व जिल्हा उपाध्यक्ष मुरली माकोडे यांनी केले. सकाळी ११ वाजता आंदोलन सुरू झाले. आंदोलनादरम्यान टोल प्रशासनाशी अनेकदा चर्चा झाली. मात्र, वरिष्ठांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीने टोल बंद करण्यात आला. मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा होईपर्यंत वसुली रोखावी अमरावती येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. प्रवीण तायडे यांनी टोलचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा होईपर्यंत परिसरातील नागरिकांकडून टोल वसुली करू नये, असे निर्देश दिले आहेत.
Source link
सर्वपक्षीय आंदोलनाचे फलित:भाजपच्या आंदोलनानंतर हैदतपूर, वडाळा टोल नाका तात्पुरता बंद, 25 कि.मी. परिसरातील नागरिकांना टोल सवलतीची मागणी