![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बसलेल्या सर्वात मोठ्या धक्क्यानंतर आता पक्ष सोडलेल्या खासदारांकडून एकामागोमाग एक भूमिका स्पष्ट केली जात आहे. शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांपैकी परभणीचे खासदार संजय ऊफ बंडू जाधव यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या मौन सोडत पक्ष सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरेंविषयी वैयक्तिक नाराजी नसल्याचं सांगतानाच, संघटनेकडे झालेलं दुर्लक्ष आणि स्थानिक राजकारणामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा त्यांनी केला. सेलू येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलताना बंडू जाधव यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले. विशेष म्हणजे, त्यांनी उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे यांना राज्यभर फिरवण्याचा सल्ला दिला होता, असा दावाही यावेळी केला. “उद्धवसाहेब तुम्हाला जमत नव्हतं, पण आदित्य ठाकरेंना तरी फिरवा म्हटलं होतं” बंडू जाधव म्हणाले की, शिवसेनेत फूट पडू लागल्यानंतर पक्षातून एकामागून एक नेते आणि कार्यकर्ते बाहेर पडताना आम्ही स्वतः पाहत होतो. त्या काळात आपण स्वतः उद्धव ठाकरेंना भेटून स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं. “साहेब, तुमची तब्येत ठीक नसते. तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र फिरणं शक्य नसेल, पण किमान आदित्य ठाकरे यांना तरी राज्यभर पाठवा. त्यांनी संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांना भेटावं. त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात.” मात्र, तसं झालं नाही. पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झालं आणि कार्यकर्त्यांशी संवाद तुटत गेला. त्याचाच परिणाम म्हणून अनेक नेते आणि पदाधिकारी पक्ष सोडून गेले, असा दावा त्यांनी केला. 2022 ला काय कमी पैसे मिळाले असते का? आता काही लोक म्हणतात, संजय राऊतही म्हणतात की, पैसे भेटले म्हणून हे फुटले. पण पैसेच घ्यायचे असते तर मग 2022ला काय कमी पैसे मिळाले असते का? राहिलोच ना तेव्हा सोबत. पण 2022 नंतर पक्ष संघटना कमकुवत होत गेली, एका पाठोपाठ एक कार्यकर्ते, नेते जात राहिले. म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह आणि येथील विकास यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. सत्तेत असल्यावर स्थानिक विकास करता येईल, पक्षाचं संघटनेचं काम चांगलं करता येईल ही भावना कार्यकर्त्यांची होती, म्हणूनच आम्हाला शेवटी निर्णय घ्यावा लागल्याचंही बंडू जाधव यावेळी म्हणाले. “बाळासाहेबांनी लावलेला वटवृक्ष जिवंत ठेवायचा होता” शिवसेना सोडण्याचा निर्णय सहज नव्हता, असं सांगताना बंडू जाधव भावनिकही झाले. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली शिवसेना ही केवळ एक राजकीय पक्ष नसून लाखो शिवसैनिकांच्या भावनांचा वटवृक्ष आहे. तो टिकून राहावा आणि पुढे जावा, अशी आमची भूमिका होती. त्यामुळेच आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला. ‘ऑपरेशन टायगर’नंतर शिवसेनेला मोठा धक्का काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाने राबवलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 विद्यमान खासदारांनी पक्षाला रामराम ठोकला. या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडींमुळे उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का बसला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संबंधित सर्व मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेत पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर टीकेची झोड उठवली. खासदार संजय राऊत यांनीही या खासदारांवर जोरदार शब्दांत हल्लाबोल केला. मात्र, या सहा खासदारांपैकी संजय दिना पाटील वगळता इतर बहुतांश खासदारांनी आतापर्यंत ठाकरे कुटुंबावर थेट टीका टाळली होती. त्यामुळे बंडू जाधव यांनी प्रथमच इतक्या स्पष्टपणे भूमिका मांडल्याने त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. वारकरी परंपरा कायम; यंदाही करणार पायी वारी राजकीय घडामोडींमध्ये चर्चेत असलेले बंडू जाधव हे वारकरी संप्रदायाशीही घट्ट जोडलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ते आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. राजकारणात कोणताही बदल झाला तरी वारीची परंपरा कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बंडू जाधव यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील संघटनात्मक कार्यपद्धती, स्थानिक नेतृत्वातील मतभेद आणि आदित्य ठाकरे यांच्या राज्यभरातील सक्रियतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांकडून आता संघटनात्मक कमतरतांवर थेट भाष्य होऊ लागल्याने आगामी काळात शिवसेनेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Source link
2022 नंतर पक्ष कमजोर झाला होता:उद्धवसाहेब, तुमचं ठीक; पण आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रभर फिरवा म्हटलं होतं; बंडू जाधव पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलले