![]()
राज्यात उच्च शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला असल्याचे एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाविद्यालय चालवण्यासाठी आवश्यक असणारी किमान विद्यार्थी संख्या नाही, पात्र प्राध्यापक नाहीत आणि प्रयोगशाळा, ग्रंथालयासारख्या मूलभूत सुविधांचा तर पत्ताच नाही, अशी तब्बल १२३ बोगस महाविद्यालये राज्यात सर्रास सुरू आहेत. विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना खुद्द सरकारनेच यावर लेखी कबुली दिली आहे. सरकारच्या या धक्कादायक खुलाशामुळे या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर आता टांगती तलवार निर्माण झाली आहे. राज्यात सर्वाधिक ८१ बोगस महाविद्यालये छत्रपती संभाजीनगर विभागात असल्याचे समोर आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विविध विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा नसल्याची बाब आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत एका प्रश्नाद्वारे उपस्थित केली होती. “विद्यापीठांकडून संलग्नता प्रदान करताना किंवा तिचे नूतनीकरण करताना निकषांचे पालन होते की नाही याची खातरजमा करण्यासाठी शासनाकडून कोणती यंत्रणा कार्यरत आहे? आणि या बोगस महाविद्यालयांवर कोणती कारवाई करण्यात येते?” असा आक्रमक सवाल त्यांनी केला. यावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी उत्तरात कायद्यानुसार अनिवार्य निकष पूर्ण न करणाऱ्या राज्यातील १२३ महाविद्यालयांची यादीच सभागृहासमोर सादर केली.
Source link
राज्यात 123 बोगस महाविद्यालये, संभाजीनगर विभागात सर्वाधिक 81:विद्यार्थी-प्राध्यापक गायब, सुविधांचा पत्ताच नाही