![]()
‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथे आषाढ वद्य कामिका एकादशीनिमित्त (धाकटी एकादशी) योगीराज संत चांगदेव महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली. मध्यरात्रीपासून सुरू झालेली दर्शनाच
.
वार्षिक परंपरेनुसार महाराष्ट्राच्या विविध भागांतून, विशेषतः खानदेश, मराठवाडा व लगतच्या जिल्ह्यांतून वारकरी दिंड्यांसह पुणतांब्यात दाखल झाले होते. शनिवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगा लावल्या. पंढरपूरची वारी पूर्ण केल्यानंतर पुणतांब्याची वारी केल्याशिवाय वारीचे फळ मिळत नाही, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे.
सुमारे ३५० ते ४०० वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत भाविकांनी दक्षिण-उत्तर वाहिनी गोदावरी नदीत स्नान करून चांगदेव महाराज तसेच श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. भाविकांसाठी मंदिर संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने मोफत महाप्रसाद, फराळ व अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी मंदिर परिसरात बॅरिकेटिंग करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व स्थानिक स्वयंसेवकांनी देवस्थान ट्रस्टला सहकार्य केले. गर्दीच्या पार्श्वभूमीवर राहाता पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चांगदेव महाराजांना भेटण्यासाठी पांडुरंग येतात महेश महाराज मुरुदगण यांनी सांगितले की, चांगदेव महाराजांच्या संजीवन समाधीनंतर निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर महाराजांप्रती असलेल्या करुणेतून ही परंपरा सुरू झाली. साक्षात पांडुरंग चांगदेव महाराजांना भेटण्यासाठी पुणतांब्यात येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यंदा दीड लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दिंड्या, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलनामाच्या जयघोषाने संपूर्ण पुणतांबा भक्तिरसात न्हाऊन निघाला.