![]()
हजारो दिव्यांच्या लखलखाटात ‘सेवा आणि विकासा’चा संदेश देत सातारा शहरात भारतीय जनता पक्षाच्या ‘सेवा संकल्प अभियाना’चा प्रारंभ करण्यात आला. पोवई नाका येथील शिवतीर्थ तसेच अटल बिहारी वाजपेयी पथावर गुरुवारी सायंकाळी दीपप्रज्वलन करून अभियानाची सुरुवात करण्यात आली. सुमारे 2 हजार 25 दिव्यांनी उजळलेला परिसर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांच्या सेवा, सुशासन आणि संकल्पाच्या पार्श्वभूमीवर 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, जनजागृती आणि विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. सातारा शहरातील कार्यक्रमावेळी भाजपचे गटनेते अविनाश कदम यांनी अभियानाची भूमिका स्पष्ट केली. दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून सेवा, विकास आणि जनकल्याणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अभियानाच्या महिनाभराच्या कालावधीत विविध सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अस्मिता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित केल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करत जनसेवेचा संकल्प या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. चित्रकला स्पर्धा, योजना जनजागृतीवर भर अभियानाच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, पर्यावरणविषयक संदेश स्पर्धा तसेच विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, योजनांच्या लाभार्थ्यांच्या मुलाखती घेणे आणि पात्र नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सेवा केंद्रे सुरू करणे, असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामुळे केवळ दीपप्रज्वलन किंवा उत्सवापुरते अभियान मर्यादित न ठेवता त्याला सेवाभिमुख स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील सेवा संकल्प अभियानातही नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, स्वच्छता, जलसंधारण, रक्तदान आणि जनजागृतीसारख्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे. पोवई नाका ते वाडे फाटा मार्गही उजळणार दरम्यान, सातारा शहरात नगरपालिका पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांच्या सहभागातून पोवई नाका ते वाडे फाटा या मार्गावरही दीपप्रज्वलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी दिवे प्रज्वलित करून सेवा, विकास आणि जनकल्याणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांतही ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत विविध कार्यक्रमांना सुरुवात झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. महिनाभर चालणाऱ्या या अभियानातून सामाजिक संस्थांपासून नागरिकांपर्यंत विविध घटकांना जोडण्यावर भर दिला जाणार आहे. योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सातारा जिल्ह्यातही सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना लाभ मिळवून देण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध सेवा आणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जाणार असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर, लोकसभा संयोजक सुनील काटकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, सार्वजनिक बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे, नियोजन सभापती अशोक शेडगे, सुशांत महाजन, गोटूशेठ भंडारी यांच्यासह नगरपालिका पदाधिकारी, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेही वाचा… अडीच वर्षांत मी शेतकऱ्यांना थेट कर्जमुक्ती दिली:आता तुमचे साडेतीन रुपये तरी शेतकऱ्यांना मिळालेत का? मुख्यमंत्र्यांच्या टीकेला ठाकरेंचे प्रत्युत्तर मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची दुरवस्था आणि राज्य सरकारचे धोरण यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिवे लावण्याच्या आवाहनावर संताप व्यक्त करताना, “शेतकऱ्यांच्या घरातले वंशाचे दिवे विझत असताना हे दिवे लावून काय साजरे करत आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, मराठवाड्याचे नेतृत्व जाणीवपूर्वक संपवले जात असल्याचा आरोप करताना गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडले नसल्याचा दावाही त्यांनी केला. सविस्तर वाचा..
Source link
भाजपच्या ‘सेवा संकल्प अभियाना’ला दीपप्रज्वलनाने प्रारंभ:महिनाभर सामाजिक उपक्रमांची रेलचेल