सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाने आपापल्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वास व्यक्त केला. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर टीका करत जनतेनेच एकनाथ शिंदे य
.
कपिल सिब्बल यांचे मत म्हणजे ब्रह्मवाक्य नाही- नरेश म्हस्के
नरेश म्हस्के म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे गटाचे वकील म्हणून त्यांची बाजू मांडत आहेत. त्यांनी मांडलेले प्रत्येक मत अंतिम सत्य मानण्याचे कारण नाही. यापूर्वीही त्यांनी कलम 370, राम मंदिर, तिहेरी तलाक, ईव्हीएम अशा अनेक प्रकरणांत वेगवेगळी मते मांडली होती. त्यामुळे न्यायालय अंतिम निर्णय देणार असून वकिलांचा युक्तिवाद म्हणजे न्यायालयाचा निकाल नसतो.
त्यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाचा निर्णय आमदार अपात्रतेपूर्वी झाला, हा मुद्दा ठाकरे गट वारंवार मांडत आहे. मात्र त्यावर न्यायालय निर्णय घेईल. आमचे वकीलही त्यांची बाजू मांडतील. त्यामुळे केवळ एका बाजूचा युक्तिवाद ऐकून निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.

जनतेच्या न्यायालयात शिवसेना कोणाची हे सिद्ध झाले!
म्हस्के यांनी दावा केला की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे मार्ग वेगळे झाल्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने शिंदे यांच्या नेतृत्वाला स्वीकारले. आमदार, नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेले प्रतिनिधी यावरून जनाधार कोणाकडे आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लोकांच्या न्यायालयात शिवसेना कोणाची, हे आधीच सिद्ध झाले आहे, असे ते म्हणाले.
‘सत्ता चुंबकासारखी असते’ या सिब्बल यांच्या विधानालाही प्रत्युत्तर
सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी “सत्ता चुंबकासारखी असते आणि लोक सत्तेकडे आकर्षित होतात” असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना म्हस्के म्हणाले, राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठीच स्थापन केले जातात. जनतेचा कौल ज्यांच्याकडे असतो तेच सत्तेत येतात. त्यामुळे सत्तेकडे लोक आकर्षित होतात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
याचवेळी त्यांनी टोला लगावत, काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यामुळे चुंबकाचा संदर्भ कोणाला लागू होतो, याचाही विचार व्हायला हवा, असे म्हटले.
सरन्यायाधीशांच्या निरीक्षणावर भाष्य टाळले
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शिवसेनेच्या पक्षघटनेबाबत केलेल्या निरीक्षणावर प्रतिक्रिया विचारली असता, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे म्हस्के यांनी सांगितले.
आधी आमदार अपात्र झाले असते तर चिन्हाचा निर्णयच झाला नसता -अनिल देसाई
दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमदार अपात्रतेचा निर्णय वेळेत झाला असता तर निवडणूक आयोगाला 17 फेब्रुवारी 2023 रोजी शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेता आला नसता.
त्यांच्या मते, 21 जून 2022 पासून संबंधित आमदारांनी केलेली कृत्ये पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेस पात्र होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी प्रथम अपात्रतेवर निर्णय देणे आवश्यक होते. तो निर्णय लांबल्यामुळे पुढील संपूर्ण घटनाक्रम बदलला.
निवडणूक आयोगाने मूळ पक्ष आणि विधिमंडळ पक्षातील फरक ओळखला नाही
देसाई यांनी आरोप केला की, निवडणूक आयोगाने मूळ राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यातील मूलभूत फरक दुर्लक्षित केला. 2018च्या पक्षघटनेचा योग्य विचार न करता केवळ विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारे निर्णय घेण्यात आला. हा मुद्दा कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर सविस्तर मांडल्याचे त्यांनी सांगितले.

आयोगाच्या निर्णयातील त्रुटी न्यायालयासमोर मांडल्या
देसाई म्हणाले की, निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन अनेक निर्णय घेतले. आयोगाच्या निर्णयातील कायदेशीर त्रुटी आणि 2018च्या पक्षघटनेकडे दुर्लक्ष केल्याचे मुद्दे आज न्यायालयासमोर मांडण्यात आले. आयोगाच्या निर्णयामुळेच पुढील संपूर्ण घटनाक्रम घडल्याचा युक्तिवादही न्यायालयात करण्यात आला.
पुढील सुनावणीकडे लक्ष
अनिल देसाई यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे गटाच्या युक्तिवादासाठी आणखी वेळ लागणार असून पुढील सुनावणीत कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिंदे गट, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांची बाजू न्यायालयासमोर मांडली जाईल. दरम्यान, आजच्या सुनावणीनंतर दोन्ही गटांनी आपापल्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वास व्यक्त केला असून सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
पक्षांतर पूर्वी घटनात्मक गुन्हा, आज सन्मानाचा बिल्ला!:सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, ठाकरे गटाचा निवडणूक आयोगावर घणाघात; आता पुढील आठवड्यात सुनावणी

शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सलग दुसऱ्या दिवशी अत्यंत महत्त्वाची आणि वादळी सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर उद्धव ठाकरे गटाचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग (ECI) आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. आजच्या सुनावणीदरम्यान पक्षांतरबंदी कायदा, पक्षाची अंतर्गत लोकशाही, निवडणूक आयोगाचे अधिकार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देत कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला. आता याप्रकरणी पुढच्या आठवड्यात पुढील सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीतील ठळक मुद्दे येथे वाचा