Headlines

Uddhav Thackeray Slams PM Modi Over Remarks On Protesting Students


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच त्यांना शिवीगाळ करणाऱ्या आंदोलक तरुणांना माफ केल्याचे एका व्हिडिओद्वारे म्हटले होते. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “अत

.

पंतप्रधान महोदय, ही मुले तुम्हाला माफ करतील का?

पंतप्रधान मोदींच्या ‘माफी’च्या विधानाचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही आधी या मुलांना झुरळ म्हटले, त्यांना भरकटलेले म्हटले. आता सांगताय की माफ केले, पण ही मुले तुम्हाला माफ करतील का? मी जेव्हा आंदोलक विद्यार्थ्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा कुणाचे हात तर कुणाचे पाय फ्रॅक्चर झाले होते. एका तरुणीने उद्वेगाने सांगितले की तिचे कपडे फाडले गेले. त्या मुलांनी जे भोगले आहे, ते ऐकूनच अंगावर शहारे येत होते.”

“या विद्यार्थ्यांची मागणी काय होती? त्यांची साधी मागणी शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याची होती. जे बदल तुम्ही आता करत आहात, ते आधी त्यांच्याशी बोलूनही करू शकत होतात. पण तुम्हाला अतिरेक्यांशी आणि पाकिस्तान्यांशी बोलायला काही वाटत नाही, मात्र आपल्याच देशाचे जे भाग्यविधाते आहेत, त्यांना तुम्ही झुरळ म्हणताय, भरकटलेले म्हणताय, मग हा देश पुढे चालणार तरी कसा?” असा खडा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

सध्याचे राज्यकर्ते स्वतःच्याच असंतोषाचे जनक

पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना देण्यात आलेल्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारावरूनही ठाकरेंनी टोला लगावला. “आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. लोकमान्यांना ‘असंतोषाचे जनक’ म्हटले जाते, कारण त्यांनी ब्रिटिशांविरोधात असंतोष निर्माण केला होता. पण या लोकांनी (सत्ताधाऱ्यांनी) स्वतःच्याच विरोधात असंतोष निर्माण केला आहे. त्यामुळे हे सध्याचे राज्यकर्ते स्वतःच्याच असंतोषाचे जनक आहेत,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

आदित्य ठाकरेंचे ट्विट- शांततापूर्ण आंदोलकांवर पेलेट गन आणि AK-47 चा वापर

दुसरीकडे, आमदार आदित्य ठाकरे यांनी एक सविस्तर ट्विट करत देशातील विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस दडपशाहीचा पाढा वाचला आहे. “चांगल्या शिक्षण व्यवस्थेची मागणी करणाऱ्या शांततापूर्ण तरुण भारतीयांच्या मोर्चावर राष्ट्रीय राजधानीत पेलेट गन, इलेक्ट्रिक शॉक बॅटन्स, अश्रुधूर आणि गंजलेले खिळे असलेल्या लाठ्या वापरण्यात आल्या. या वस्तुस्थितीवरून इतर कोणत्याही चर्चेने तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका.”

बिहारमध्ये AK-47 चा वापर

“बिहारमध्ये अशाच एका आंदोलनाला पांगवण्यासाठी चक्क AK-47 बंदुकीचा वापर करण्यात आला. केंद्रीय मंत्र्यांनी याविषयी देशाशी खोटे बोलले. पण स्वतंत्र आणि जागतिक मीडियासह सोशल मीडियावरून ही दडपशाही समोर आलीच.”

कंटेंट क्रिएटर्स आणि महिलांना लक्ष्य

“सरकारची ही क्रूरता जगासमोर उघड करणाऱ्या आणि रिल्स बनवणाऱ्या तरुण कंटेंट क्रिएटर्सच्या मागे आता ही राजवट लागली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या घरातून ताब्यात घेतले गेले. महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींना अद्याप निलंबित केलेले नाही.”

अंधभक्तांकडून धमक्या

“शांततापूर्ण आंदोलकांना मारहाण करून त्यांचा आवाज दाबला गेला. काही भाजप समर्थक हँडल्सनी तरुण पिढीचा अपमान करणारे मूर्खपणाचे व्हिडिओ टाकले. तर ‘अंधभक्तांनी’ त्यांच्या संस्कारांनुसार महिलांना शिवीगाळ केली आणि तरुणांना धमक्या दिल्या. सोशल मीडियावर येऊन कोणताही दिखावा केला, तरी सरकारने केलेल्या या कृत्यांवर पांघरूण घालता येणार नाही,” असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा..

मुलांना माफ करण्याऐवजी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागा:पंतप्रधान मोदींवर नाना पटोलेंची टीका, अमित शहांच्या राजीनाम्याचीही मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच त्यांना शिवीगाळ करणाऱ्या मुलांना माफ केल्याचे वक्तव्य केले होते. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘एक्स’ अकाऊंटवरून पंतप्रधानांवर जोरदार पलटवार केला आहे. मुलांना माफ करण्याचे नाटक करण्याऐवजी पंतप्रधान महोदय, आपणच देशातील मुलांची माफी मागायला हवी, अशी थेट मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

मुले मनाने निरागस आणि प्रामाणिक असतात. समाजात जे घडते, त्यातूनच ती शिकतात. सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्या आणि अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या व्यक्तींना जेव्हा प्रोत्साहन मिळते, तेव्हा त्याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो, असे पटोले म्हणाले. येथे वाचा संपूर्ण बातमी

अभिजित दिपकेंचा थेट सवाल:शिवीगाळ करणे हा गुन्हा असेल, तर भाजपच्या आयटी सेल आणि नेत्यांवर कधी कारवाई होणार? तरुणीवरील FIRला विरोध

दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल आक्षेपार्ह व अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या रुचिका सिंग या तरुणीवर नोएडा पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या कारवाईला ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके आणि पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “शिवीगाळ करणे हा काही गुन्हा नाही; जर तसे असेल तर महिलांना ऑनलाइन घाणेरड्या शिव्या देणाऱ्या भाजपच्या आयटी सेलवर आणि नेत्यांवर गुन्हे कधी दाखल होणार?” असा थेट सवाल अभिजीत दिपके यांनी विचारला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.