![]()
झाडे अनेक जण लावतात; पण त्या झाडांचे संगोपन मोजकेच लोक करतात. ठाणगाव येथे मागील वर्षी लावलेल्या वृक्षांपैकी ९५ ते ९८ टक्के झाडे आजही जिवंत आहेत. वृक्षप्रेमासाठी तुम्हीही वेडे व्हा. मीदेखील वृक्षप्रेमी वेडा आहे, असे आवाहन अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी श
.
ठाणगाव येथे दंडक अरण्य अभियान २०२५-२६ अंतर्गत श्रीजी ग्रुप, जय हिंद लोक चळवळ संगमनेर, वन विभाग सिन्नर, सामाजिक वनीकरण विभाग नाशिक व संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १०० हेक्टर जागेत तब्बल १ लाख २० हजार रोपांचे वृक्षरोपण करण्यात आले आहे. या वृक्षरोपणाच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन येथील बेल टेकडी परिसरात करण्यात आले. कार्यक्रमास विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, विभागीय आयुक्त प्रवीण गेंडाम, जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद, मुख्य वनसंरक्षक गजेंद्र हिरे, अतिरिक्त आयकर आयुक्त भरत आंधळे, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई’ या कमानीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भोर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वृक्षांवर आदिवासी नृत्य सादर केले.यानंतर बेल टेकडीच्या पायथ्याशी कार्यक्रमास सुरुवात झाली. झाडेच आपली आई आहेत. झाड हेच आपल्यासाठी ग्रेट आहे. आपल्या आदिवासी लोकांमुळे भारत जिवंत आहे. आदिवासी लोकांनीच जंगलांचे रक्षण केले होते. आदिवासी व गरीब लोकांमुळेच आपली संस्कृती आजही टिकून आहे. पहिले घरासाठी जंगल तोडले, आता घर मोडून जंगल करावे लागेल; तेव्हाच पुढील पिढ्यांना ऑक्सिजन मिळेल, असे सयाजी शिंदे म्हणाले.