![]()
जिल्ह्यात गत दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडला असून, संकटग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, यासह अन्य मागण्यांकरिता काँग्रेस आता रस्त्यावरील लढाई लढणार आहे. बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस नेते बेमुदत उपोषण करणार
.
यंदा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माथी सोयाबीनचे बियाणे बोगस मारण्यात आले. त्यानंतर सुमारे दीड महिन्यांपासून पावसाचा खंड असून, सोयाबीन, कापसासह अन्य पिकं सुकली आहेत. जिल्ह्यात २ लाख २० हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. मात्र पावसाच्या दीर्घखंडामुळे अनेकांनी पीक मोडून आता पुढील हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांनी तातडीने पंचनामे करून अहवाल तयार करणे अपेक्षित होते. मात्र पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे सरकारने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.
जून व जुलै महिन्यात अत्यल्प व खंडित पाऊस झाल्याने पेरणी लांबली, नंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस अनियमित व खंडित झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका यांसह सर्व खरीप पिके गंभीर संकटात सापडली आहेत. जमिनीतील ओलावा संपल्याने अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून उत्पादनात मोठी घट होणार आहे. विहिरी, बोअरवेल आटल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
१ लाख शेतकरी कुटुंबं अडचणीत : जिल्ह्यातील सोयाबीन हे प्रमुख पीक असून सुमारे २.०५ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी जवळपास १.५० लाख हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे सुमारे १ लाख शेतकरी कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे.शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे काँग्रेस नेते अशोक अमानकर यांचे म्हणणे आहे. या आंदोलनातून शासनाकडे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीन प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, सर्व दुष्काळी सवलती आणि मदतीचा लाभ तातडीने द्यावा. सोयाबीन पिकाचे तातडीने वस्तुनिष्ठ सर्वेक्षण व पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी. शासकीय कार्यालयात बसून कागदोपत्री अहवाल तयार करण्याऐवजी प्रशासनाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करावी. पात्र शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई तातडीने द्यावी. नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पीकविमा दाव्यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई तातडीने मिळवून द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
गत आठवड्यात दुष्काळ जाहीर करण्यासह सध्याच्या पीक परिस्थितीबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली ैहाती. . या परिस्थितीबाबत शासनाला माहिती देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मागण्या मान्य होऊन मदत न मिळाल्यास आठवडाभरानंतर जिल्ह्यात संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानुसार आता माजी जिल्हाप्रमुख तथा काँग्रेसचे नेते अशोक अमानकर यांनी बेमुदत उषोषणाची घोषणा केली आहे.