Headlines

निवडणुका जिंकण्याची भाजपची पद्धत 'फ्रॉड':राज ठाकरेंचा आरोप, मोहन भागवतांच्या विद्यार्थी संवादावर म्हणाले- उशीर झाला




महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून, आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी राज्याची सद्यस्थिती, नाशिकमधील खड्डे, ‘नीट’ परीक्षेतील घोळ आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज्य व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “सगळी शहरे बर्बाद होत आहेत, तरीही तुम्ही भाजपच्या लोकांना निवडून देत असाल तर भोगा,” अशा शब्दांत त्यांनी नाशिककरांना आणि जनतेला खडेबोल सुनावले. नाशिकची दुरवस्था आणि कुंभमेळ्याचे कंत्राट नाशिकच्या सद्यस्थितीवर संताप व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले, “२०१५ मध्ये कुंभमेळा झाला, पण नाशिककरांना नेमकी काय कामे झाली हे कळलेच नाही. आज संपूर्ण शहरात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे निष्पाप लोकांचे मृत्यू होत आहेत, पण माणसांच्या जीवाशी सरकारला काहीही देणेघेणे उरलेले नाही. आगामी कुंभमेळ्यासाठी अनेक कंत्राटदार हे गुजरातमधून आणले जात असल्याची माहिती आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली सगळी शहरे बर्बाद होत आहेत. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून प्रशासन पूर्णपणे ढिम्म आहे.” CJP चे आंदोलन आणि विद्यार्थ्यांचा रोष शिक्षण व्यवस्थेविरोधात जंतर-मंतरवर सीजेपी (कॉक्रोच जनता पार्टी) आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावरही राज ठाकरेंनी भाष्य केले. ते म्हणाले, “सीजेपी आणि विद्यार्थ्यांचा जो रोष आहे, तो थेट शिक्षण व्यवस्थेविरोधात आहे. जंतर-मंतरवर झालेले आंदोलन हा विद्यार्थ्यांच्या आणि पर्यायाने घराघरातील पालकांच्या सरकारबद्दलच्या रागाचा उद्रेक होता. जेव्हा तिथे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, तेव्हा प्रत्येक पालकाला वाटले की ‘आमच्या मुलांना का मारले?’ जर रास्त मागण्या करूनही सरकार ऐकत नसेल, तर हे असेच होणार, ही तर फक्त सुरुवात आहे.” जंतर-मंतरवर आंदोलन सुरू असतानाच दोन पेपर फुटल्याचा गंभीर मुद्दाही त्यांनी मांडला. ‘नीट’ पेपरफुटी आणि कोचिंग क्लासेसचा बाजार शिक्षण व्यवस्थेच्या बाजारीकरणावर टीका करताना ठाकरे म्हणाले, “काल मला अनेक विद्यार्थी भेटले. आजकाल मुले कॉलेजला न जाता थेट कोचिंग क्लासेसला जातात. कॉलेजची फी २० हजार आणि क्लासची फी लाखांच्या वर, ही कुठली पद्धत आहे? सगळेच क्लास वाईट नाहीत, पण अनेकांनी याचा धंदा मांडून ठेवला आहे. ‘नीट’चे पेपर याच क्लासेसमधून फुटले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दगडांवरचे ठसे शोधण्यापेक्षा या गंभीर प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे. मुख्यमंत्र्यांनीही यात लक्ष घातले पाहिजे.” नाशिकमधील यश गोसावी या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा उल्लेख करत त्यांनी सरकारला जाब विचारला. “२१ मुलांची नावे आहेत, मग यशचे नाव २२ वे का नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चीनचे उदाहरण आणि मंत्र्यांच्या मुलांवर टीका ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील एका लेखाचा संदर्भ देत राज ठाकरेंनी भारत आणि चीनच्या परीक्षा पद्धतीची तुलना केली. “चीनमध्ये १० वीनंतरची एक परीक्षा दीड कोटी मुले देतात. तिथे पेपर काढणाऱ्या शिक्षकांना महिनाभर सुरक्षित ठिकाणी ठेवले जाते. संपूर्ण देश या परीक्षेसाठी मदत करतो. आपल्याकडे मात्र नीट परीक्षेबाबत कुणालाच गांभीर्य नाही.” शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मंत्र्यांची मुले परदेशात शिकत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मोहन भागवतांना दोन शब्दांत टोला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावर राज ठाकरेंनी केवळ दोन शब्दांत मार्मिक प्रतिक्रिया दिली, “उशीर झाला.” दिल्लीहून आल्यानंतर दिलीप गावित यांची भेटणार – राज ठाकरे कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेते खेळाडू दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना नियोजित भेटीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागल्याची चर्चा रंगली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “दिलीप गावित दिल्लीहून परतल्यानंतर त्यांची भेट घेणार आहे,” असे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच ही भेट होण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना प्रशांत किशोर यांचा थेट अल्टीमेटम, राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठ्या संघटनात्मक बदलांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत त्यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “जर भविष्यात रणनीतीकार म्हणून माझ्यासोबत काम करायचे असेल, तर प्रदेशाध्यक्षपदाबाबत ठोस निर्णय घ्यावा लागेल,” असा थेट सल्ला दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *