![]()
वृक्षांचे वाढदिवस साजरा करणे काळाची गरज आहे. वृक्ष जगले तरच मानव जात जिवंत राहणार आहे. यासाठी झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची मंगळवेढ्यातून वारी परिवाराने सुरू केलेली संकल्पना महाराष्ट्रात सुरू झाली पाहिजे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी व्यक्त केले. वारी परिवार व विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या वतीने शिवाजी महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा-पंढरपूर हरित पालखी महामार्गावर पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०१९ रोजी लावलेल्या झाडांचा सातवा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सेंद्रिय खताचा केक कापून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. वृक्षांचा वाढदिवस साजरा करणे ही आदर्शवत संकल्पना रुजवित वारी परिवाराचा ५ जून पर्यावरण दिन साजरा होत असतो. सुरुवातीस पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे व एसटी महामंडळाचे आगार प्रमुख गुरुनाथ रणे यांच्या हस्ते वृक्षांचे पूजन करून सेंद्रीय खतापासून तयार केलेला केक कापून वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्येक झाडांना लावलेले रंगीबेरंगी फुगे, रांगोळी, फुलांची सजावट विशेष लक्ष वेधून घेत होते. या कार्यक्रमासाठी दत्तात्रय भुसे, भरत राजपुरोहित, नंदकुमार साळुंखे, मारुती जाधव, रविराज जाधव, संजीवनी फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले. यावेळी मल्लया स्वामी, चंगेजखान इनामदार, सिद्धेश्वर शिंदे, दत्तात्रय भोसले, वारी परिवाराचे सदस्य, चालक-मालक मोटर संघटनेचे सदस्य आणि निसर्ग प्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. विनायक कलुबर्मे यांनी केले. एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे म्हणाले, प्रत्येक झाड मानवाला ऑक्सिजन देते. झाडे नष्ट झाली तर ऑक्सिजन मिळणार नाही. स्वतःचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन हाच एकमेव पर्याय असून झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळा आदर्शवत आहे. वाढते तापमान कमी करायचे असेल तर वृक्ष लागवड हाच पर्याय आहे, असे त्यांनी सांगितले.
Source link
पालखी मार्गावर वृक्षांचा 7 वा वाढदिवस:सेंद्रिय खताचा केक कापून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश