Headlines

पूल, रखडलेल्या पाणंद रस्त्यांसाठी पालकमंत्र्यांना साकडे:पिंपळोद गावातील सुमारे 70 टक्के शेती ही बोर्डी नदीच्यापलीकडे




पिंपळोद गावातील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले पाणंद रस्ते, स्मशानभूमीत जाण्याचा मार्ग आणि बोर्डी नदीवरील पुलाचे बांधकाम तात्काळ मार्गी लावावे, या मागणीसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते बबन पाटील पटांगे आणि युवा शेतकरी कौस्तुभ पाटील घोम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे घातले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, पिंपळोद गावातील सुमारे ७० टक्के शेती ही बोर्डी नदीच्यापलीकडे आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत नदीला २५ ते ३० फूट खोल पाणी असते. अशा अत्यंत धोकादायक परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि गुराढोरांना आपला जीव मुठीत घेऊन नदी ओलांडावी लागते. यापूर्वी नदी ओलांडताना अनेक जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही अत्यंत गंभीर बाब लक्षात घेता, बोर्डी नदीवर तातडीने मोठा पूल मंजूर करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात उपोषणही केले होते. पिंपळोद ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंचांनी शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा केला आहे. या पाठपुराव्यामुळे काही रस्ते मंजूर झाले असले, तरी त्यांचे काम अजूनही प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बोर्डी नदीवर तात्काळ पूल मंजूर करावा, अशी मागणी अत्यंत तीव्र गतीने पुढे आली आहे. या निवेदनाची दखल घेऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आता पिंपळोदच्या शेतकऱ्यांची सुटका करणार का ? याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. जीवघेणा प्रवास थांबवावा “पावसाळ्याचे चार महिने पिंपळोदच्या शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आहेत. शेतात जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने वृद्ध शेतकरी आणि मजुरांना ३० फूट खोल नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो. पालकमंत्र्यांनी या संवेदनशील विषयाची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, हीच आमची आर्त हाक आहे,अशी प्रतिक्रीया पिंपळोद येथील बबनदादा पाटील पटांगे यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *