![]()
हिरपूर येथे सोमवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रामसभा वादळी ठरली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंवदा मोरे होत्या. ग्रामसभेच्या सुरुवातीला ‘सेल्फ सर्व्हे’अंतर्गत घरकुल लाभार्थींच्या यादीचे वाचन करण्य
.
ग्रामस्थांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विशेषतः मागील पाच वर्षांत झालेल्या विकासकामांचा खर्च, शासनाकडून प्राप्त निधी, त्याचा विनियोग याबाबत स्पष्ट माहिती ग्रामसभेत देण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यात गावातील जवळपास सर्वच रस्ते चिखलमय झाले आहेत. नाल्यांची सफाई, उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रश्न विचारला असता गावात बैलगाड्यांची संख्या अधिक असल्याने रस्ते खराब झाल्याचे कारण सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीला विविध मागण्या, प्रश्नांचे निवेदन देण्यात आले. त्यावर ग्रामसभेत चर्चा झाली. संबंधित माहिती १५ दिवसांत उपलब्ध करून देण्याचे ठरवण्यात आले. ग्रामस्थांनी गत पाच वर्षांतील सर्व ग्रामसभांची वैधता, कामकाजाची माहिती, पाच वर्षांतील ग्रामसभांचे इतिवृत्त, ठरावांची माहिती, पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त निधी, झालेला खर्च, केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निधी, त्याचा विनियोग, जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामांची माहिती, खर्च, गावातील पथदिवे बसवणे, दुरुस्तीवर झालेला खर्च, गावातील साफसफाई, नाल्या उपसण्यावर झालेला खर्च, कचरागाडी, घंटागाडी खरेदी, देखभालीवर आतापर्यंत झालेला खर्च, कोंडवाडा बंद असण्याचे कारण, असे प्रश्न विचारले. गावात ठिकठिकाणी कचराकुंड्या केल्या. परंतु त्यांची नियमित साफसफाई होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. कचरागाडीही ग्रामपंचायत कार्यालय परिसरात धूळखात पडून आहे. त्यामुळे गावात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मच्छरांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गोंधळ घालण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांची एकजूटः ग्रामसभा सुरू असताना काही व्यक्तींनी गोंधळ घालून ग्रामसभा उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. मात्र, यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र राहिल्याने ग्रामसभा सुरू ठेवण्यात आली. गावातील समस्या आणि प्रश्न ग्रामसभेत मोकळेपणाने मांडता येतात, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
गावातील पाण्याच्या टाकीचे सात वर्षांपूर्वी ऑडिट झाले असून दुरुस्ती व उपाययोजना करण्याचे आदेश असतानाही गत पाच वर्षांत ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गावातील नळ अनेकदा बंद असतात. तर कधी दुर्गंधीयुक्त पाणी येते, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. ग्रामसभेत विविध प्रश्नांवरून वातावरण संतप्त झाले. ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी निधीचा पारदर्शक हिशोब, विकासकामांची माहिती व मूलभूत सुविधांबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली. अखेर संतप्त वातावरणात ग्रामसभेचा समारोप झाला. ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.