Headlines

'सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय!':राजू शेट्टींचा केंद्र सरकारवर घणाघात; वांगचुक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च




सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई आणि ‘नीट’ परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ जयसिंगपूर शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्त सर्वपक्षीय कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करून सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे, अशी सडकून टीका राजू शेट्टी यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणाऱ्या या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेत, लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासह विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी अतिशय शांततापूर्ण मार्गाने आपला निषेध नोंदवला. यावेळी केंद्र सरकारवर टीका करताना राजू शेट्टी म्हणाले, देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विरोधी मतांचा आदर केला पाहिजे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे. सोनम वांगचुक यांच्यासारख्या देशहितासाठी आवाज उठविणाऱ्या व्यक्तींना दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. नीट परीक्षेच्या संदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले, लाखो विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षेला सामोरे जातात. मात्र, परीक्षा प्रक्रियेत घोटाळे आणि अनियमितता होत असतील तर विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फिरते. देशातील विद्यार्थ्यांचा परीक्षांवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी नीट घोटाळ्याची सर्वोच्च स्तरावर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. याप्रसंगी दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी नागरिकांना संबोधित करताना अन्यायाविरोधात समाजाच्या एकजुटीची गरज बोलून दाखवली. सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई असो किंवा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा ‘नीट’ घोटाळा, अशा प्रत्येक अन्यायकारक घटनेविरोधात समाजाने एकत्र उभे राहिले पाहिजे, असे सांगून हा कॅन्डल मार्च कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून तो केवळ लोकशाही, न्याय आणि देशाच्या भवितव्याच्या रक्षणासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *