![]()
आगामी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने संपूर्ण देशभरात 9 ते 17 ऑगस्टदरम्यान भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत 10 ऑगस्ट रोजी मुंबईत विशेष तिरंगा रॅली पार पडणार असून, यामध्ये राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस स्वतः हातात तिरंगा घेऊन सहभागी होणार आहेत. या रॅलीत तब्बल 20 ते 25 हजार युवक-युवती सहभागी होणार असून, तरुणाईला पक्षाशी जोडण्यासाठी भाजपने हे मोठे नियोजन केले आहे. मुंबईत 10 ऑगस्टला भव्य सोहळा; 25 हजार तरुणांचा सहभाग स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने देशभक्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे व्यापक अभियान हाती घेण्यात आले आहे. 10 ऑगस्ट रोजी मुंबईत होणारी रॅली या अभियानाचे मुख्य आकर्षण असेल. या रॅलीमध्ये मुंबई आणि लगतच्या परिसरातून सुमारे 20 ते 25 हजार तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. देवेंद्र फडणवीस स्वतः या रॅलीचे नेतृत्व करणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. 9 ते 17 ऑगस्टदरम्यान राज्यभरात विविध कार्यक्रम केवळ मुंबईतच नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पदाधिकारी आपापल्या जिल्ह्यांमधील रॅलींमध्ये सक्रिय सहभागी होतील. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या शहरांसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. या अभियानात विविध सामाजिक संस्था, मित्रपक्ष आणि समविचारी संघटनांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी भाजपची विशेष रणनीती? गेल्या काही दिवसांत नीट (NEET) परीक्षांचा गोंधळ आणि शैक्षणिक मुद्द्यांवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभरातील तरुणाईने मोठे आंदोलन उभारले होते. या पार्श्वभूमीवर, तरुणांमधील असंतोष दूर करून त्यांना पुन्हा पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी भाजपने या ‘तिरंगा रॅली’चे आयोजन केले असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि देशभक्तीच्या भावनेच्या माध्यमातून तरुण वर्गाला एकत्र आणत, पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा भाजपचा हा प्रयत्न मानला जात आहे. हेही वाचा.. अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघात:भरधाव ट्रकने कामगारांना चिरडले; तिघांचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर अमरावती जिल्ह्यातील सावर्डीजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना भरधाव ट्रकने कामावरील मजुरांना चिरडले. या भीषण धडकेत ट्रकचालकासह दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा
Source link
स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपची देशभरात 'तिरंगा रॅली':10 ऑगस्टला मुंबईत 25 हजार तरुणांसह देवेंद्र फडणवीस उतरणार रस्त्यावर!