![]()
शिवसेना नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या मालकीवरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अंतिम सुनावणीत बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे) उद्धवसेनेवर थेट आणि आक्रमक हल्ला चढवला. “पक्षात अंतर्गत निवडणुका बंद करून केवळ एका सहीने पदे वाटली जात होती. २०१८ मधील घटनादुरुस्तीने सामान्य कार्यकर्त्यांचे अस्तित्व संपवून एकाधिकारशाही आणली, असा युक्तिवाद शिवसेनेचे ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या मनमानी कारभाराविरुद्धच शिंदेंचा उठाव असल्याचेही त्यांनी ठणकावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० वाजता होणार आहे. न्यायालयात पक्षाच्या संघटनात्मक इतिहासाचा दाखला देत अॅड. कौल म्हणाले की, २०१८ च्या घटनादुरुस्तीने सर्व अधिकार एकाच व्यक्तीकडे केंद्रित केले गेले. अंतर्गत निवडणुकांशिवाय केवळ एका सहीने पदे वाटल्यामुळे कार्यकर्त्यांचा निवडण्याचा किंवा नाकारण्याचा मूलभूत अधिकार हिरावला गेला. २०१९ ला भाजपसोबत युती करून निवडणूक लढल्यानंतर थेट विरोधकांशी हातमिळवणी करण्यात आली. या टोकाच्या एकाधिकारशाही आणि अंतर्गत घुसमटीतूनच हा उठाव झाला. कोण आहेत नीरज कौल या खटल्यात शिवसेनेची बाजू मांडणारे ॲड. कौल यांनी या पूर्वी समलिंगी विवाह कायदेशीर मान्यता, बायजू विरुद्ध बीसीसीआय, दिल्ली बाइक-टॅक्सी बंदी प्रकरणात महत्त्वाचा युक्तिवाद केला. १५ एप्रिल २००९ रोजी त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र काही महिन्यांतच त्यांनी राजीनामा दिला. आधी हिंदुत्व, आता धनुष्यही गोठवणार का?- शिंदे दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले ‘हम करे सो कायदा’ अशी हुकूमशाही चालवून त्यांनी (उद्धव ठाकरे) बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले, हिंदुत्वही गोठवले; आता थेट धनुष्यबाण गोठवण्याची मागणी न्यायालयात करत आहेत. आम्ही कुठेही पक्षांतर केलेले नाही; लोकशाहीत विधिमंडळातील बहुमत आणि जनतेचा पाठिंबाच सर्वोच्च असतो आणि त्या बळावर खरी शिवसेना आमचीच आहे.
Source link
2018 ला घटनादुरुस्तीने शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांचे अस्तित्व संपले- ॲड.कौल:पक्ष-चिन्ह वादावर सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची बाजू मांडणे सुरू