आगामी 2027 च्या कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय नियोजनाचे चक्र फिरू लागले असले तरी, वाहतुकीचा प्रश्न आ वासून उभा आहे. 2015 च्या सिंहस्थानंतर नाशिकच्या रस्त्यांवर 9 लाख 28 हजार नवीन वाहनांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, ज्या रस्त्यांवरून हा वाहतुकीचा भार वाहिल
.
आरटीओने दिलेल्या आकडेवारी ही शहरातील कोंडीवर शिक्कामोर्तब करणारी आहे. 2015-16 मध्ये नाशिकमध्ये 7 लाख 32 हजार वाहने होती, जी 2023-24 मध्ये वाढून 16 लाख 60 हजारांवर पोहोचली आहेत. यात सर्वाधिक 11.57 लाख संख्या दुचाकींची आहे. शहराची रस्तेरचना ‘रेडिअल’ स्वरूपाची असल्याने बाहेरून येणारी 74 टक्के वाहतूक थेट शहरात प्रवेश करते. बाह्य रिंगरोडअभावी या वाहनांना शहराबाहेरून वळवणे प्रशासनाला कठीण जाणार आहे. या सर्व खेळात कुंभमेळा काळात शहरवासीय मात्र वेठीस धरले जाण्याची शक्यता आहे.
बाह्य रिंगरोडची गरज
बाह्य रिंगरोड हा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लक्झरी नसून, मूलभूत गरज आहे. शासनाने याकडे डोळेझाक केल्यास मोठा फज्जा उडू शकतो. निर्णय घेणे अपेक्षित आहे. – भागवत आरोटे, नगरसेवक
पोलिसांनी तातडीने पावले उचलावीत
शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत, सुरक्षित व्हावी यासाठी होमगार्ड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांनी तातडीने पावले उचलावीत. – हिमगौरी आडके, महापौर
2015 ची आणि 2027 ची तुलनात्मक आकडेवारी अशी
तपशील 2015 सिंहस्थ 2027 सिंहस्थ फरक/वाढ (प्रत्यक्ष) (अपेक्षित) एकूण लोकसंख्या 17 लाख 26.10 लाख 54% वाढ पर्वणीच्या दिवशी गर्दी 50 लाख 80 लाख 30 लाख अधिक साधू-महंतांची संख्या 3 लाख 5 लाख 2 लाख अधिक आरटीओ नोंदणीकृत वाहने 7,32,008 16,60,841 (2024 पर्यंत) 9,28,833 वाढ मुख्य रस्त्यांची स्थिती नवीन बांधलेले 10 वर्षे जुने / खराब
यामुळे अडकला नवा ‘बाह्य रिंगरोड’
सिंहस्थ परिक्रमा मार्ग म्हणून ओळखला जाणारा 60 किमी लांबीचा आणि 60 मीटर रुंदीचा बाह्य रिंगरोड वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत आवश्यक होता. मात्र, वाढीव टीडीआरची मागणी, भूसंपादनासाठी लागणारा हजारो कोटींचा निधी आणि महापालिकेकडे असलेल्या निधीचा अभाव यामुळे या रस्त्याचा समावेश सिंहस्थ आराखड्यात झालेला नाही. याचा थेट परिणाम शहरातील अंतर्गत वाहतुकीवर होणार आहे.
रस्त्यांचे आयुर्मान संपले, देखभालीचा अभाव
शहरातील मुख्य रस्ते 2015 च्या सिंहस्थात तयार झाले होते. तांत्रिक निकषांनुसार अशा रस्त्यांचे आयुष्य 3 ते 5 वर्षे असते. सध्या या रस्त्यांवर क्रॅकिंग, रटिंग आणि सेटलमेंट यांसारखे गंभीर दोष निर्माण झाले आहेत. निधीअभावी या रस्त्यांचे योग्य वेळी अस्तरीकरण होऊ शकले नाही, त्याचा फटका आता सिंहस्थात बसू शकतो.

कोंडी सोडवण्यासाठी शहरात होमगार्ड नेमावे
शहरातील सहाही विभागात सिंहस्थ कुंभमेळा विकास कामे जोरात सुरू असून, वाहतूक वॉर्डन नेमण्यात आले असले तरी वाहतूक कोंडी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आडके यांनी पोलीस आयुक्त यांना पत्राद्वारे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी होमगार्ड नेमण्याची मागणी केली आहे.
कुंभमेळ्यानिमित्त विविध विकासकामे सुरू आहेत. त्यात रस्ते दुरुस्ती, नवे रस्ते, पूल, उड्डाणपूल तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांचे कामे सुरु आहेत. त्यामुळे शहरभर रस्ते खोदकाम सुरू आहे. अनेक प्रमुख व अंतर्गत रस्त्यांचे डायव्हर्जन करण्यात आले असून, काही रस्ते तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत असून, वाहनचालकांची मोठी दमछाक होत आहे. विकासकामे सुरू असलेल्या काही ठिकाणी ठेकेदारांमार्फत ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु, त्यांची संख्या अपुरी असल्याचे पत्रात म्हटले आहे. रिंग रोड, रस्त्याची सुरू असलेली कामे, प्रमुख चौक, सिग्नल पॉइंट, डायव्हर्जन मार्ग आणि गर्दीच्या भागांमध्ये होमगार्डची नियुक्ती करून वाहतूक कोंडी कमी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
तरच मोठ्या वाहनाचा वापर करावा
वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. रस्ते तेच आहेत, वाहनांची संख्या मात्र वाढली आहे. प्रशासनाने आता बाह्य रिंगरोड तत्काळ करावे, शहरातील रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण होणारे अतिक्रमण काढवे. वाहनचालकांनी नियमांचे पालन केले तर कोंडीची समस्या निर्माण होणार नाही. गरज असले तरच मोठ्या वाहनाचा वापर करावा. – डॉ. सिताराम कोल्हे, सेवा निवृत्त एसीपी
रामवाडीकडील गोदापार्कमध्ये होणारी गर्दी, रस्त्याची चाललेली कामे यामुळे पंचवटीतून गंगापूररोडकडे जाणारी वाहतूक कोशिरेमार्गावरुन जात असल्याने रोज मोठी वाहतूक कोंडी होत आहे. मंगळवारी (दि. 12) सायंकाळीही येथे तब्बल दीड ते दोन तास वाहन चालक अडकले होते.