![]()
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच वाहतूक शिस्तीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, शिवनगर, कन्नड येथील विद्यार्थ्यांनी चित्रकले
.
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला कलात्मकतेची जोड देत विविध चित्रांच्या माध्यमातून हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचे महत्त्व, सिग्नलचे पालन, वाहन चालविताना मोबाइलचा वापर टाळणे, रस्त्यावर सुरक्षितपणे प्रवास करणे, पादचाऱ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करणे तसेच वेगावर नियंत्रण ठेवणे यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर जनजागृतीपर संदेश मांडले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ चित्रकला सादर केली नाही, तर ‘वाहतूक नियम पाळा आणि सुरक्षित जीवन जगा’ हा सामाजिक संदेश आपल्या कलाकृतीतून प्रभावीपणे मांडला. विद्यार्थ्यांच्या चित्रांमध्ये रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांविषयी असलेली जागरूकता दिसून आली. या उपक्रमाची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी आरती पवार यांनी केली.
विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयाची निवड करून चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा केलेला प्रयत्न पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. यावेळी बोलताना पवार यांनी सांगितले की, वाहतूक नियमांचे पालन करणे ही केवळ पोलिसांची किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचा संदेश घराघरात पोहोचू शकतो. त्यामुळे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांची माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
विद्यार्थ्यांनीही या उपक्रमातून मिळालेला संदेश स्वतःच्या आचरणात आणण्यासोबतच आपले पालक, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनाही वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प व्यक्त केला. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध सामाजिक विषयांवर आधारित उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जात असून, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, जबाबदारीची भावना, सर्जनशीलता आणि नागरिकत्वाचे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाहतूक नियमांवर आधारित चित्रकला उपक्रम राबवण्यात आला. आभार मुख्याध्यापक प्रकाश जिरेमाळी यांनी मानले.