![]()
भारत हा युवकांचा देश असून देशाचे वर्तमान आणि भविष्य घडविण्याची मोठी जबाबदारी आजच्या युवकांवर आहे. आत्मविश्वास, योग्य नियोजन, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शक्तीचा व विचारांचा सकारात्मक उपयोग करून स्वतःसोबत राष्ट्राचेही भविष्य घडवावे, असे प्रतिपादन डॉ.अशोक चव्हाण यांनी केले. म.शि.प्र.मंडळ संचलित छत्रपती शाहू महाविद्यालय, लासूर स्टेशन येथे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘यशस्वी भव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व प्रेरणा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी परीक्षा नियंत्रक तथा वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नव्हे, तर ध्येय निश्चित केल्यापासूनच सुरू झाली पाहिजे, असे सांगत डॉ.चव्हाण यांनी पूर्वनियोजन व सातत्याचे महत्त्व स्पष्ट केले. लाखो विद्यार्थी परीक्षेकडे आकर्षित होतात; मात्र सातत्याने आणि गांभीर्याने तयारी करणारे विद्यार्थीच यशस्वी ठरतात, असे त्यांनी सांगितले. बदलत्या काळाचा संदर्भ देत त्यांनी ‘जनरेशन झेड’मधील युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, सकारात्मक विचारसरणी आणि स्वतःच्या क्षमतांची ओळख करून घेण्याचे आवाहन केले. स्पर्धा परीक्षांमध्ये केवळ बुद्धिमत्ता नव्हे, तर शिस्त,आत्मविश्वास, नियोजन,सातत्य आणि परिश्रम आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. उपप्राचार्य व्ही. एस.अहिरे, ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी मकसूद शेख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ.मधुकर साठे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. न. ब. कदम यांनी केले. आभार उपप्राचार्य विलास अहिरे यांनी मानले. ग्रामीण विद्यार्थ्यांनी न्यूनगंड झटकावा : डॉ. बदर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. काकासाहेब बदर यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता ध्येयवेडे होण्याचे आवाहन केले. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मेहनत,चिकाटी व संघर्ष करण्याची मोठी क्षमता असून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तेही मोठे यश संपादन करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
Source link
परिपूर्ण विद्यार्थी हीच राष्ट्राची खरी संपत्ती- डॉ. अशोक चव्हाण:लासूरमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व प्रेरणा शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन